मंगलवार, 15 सितंबर 2020

आम्ही एकांकिका करणारचं... आणि बरचं काही..!

आम्ही एकांकिका करणारचं आणि बरचं काही....!!!
 

परवा आदरणीय प्रा.महादेव रोकडे सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की, आपल्या कॉलेजची अण्णा भाउ साठेंच्या कथेवर आधारित 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका भरत नाटय मंदिरला 19 आॅगस्टला सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे. तुला यावचं लागेल..! सरांच्या आज्ञेला'होकार' दिला. आणि भूतकाळाचा विचार करू लागलो. सात—आठ वर्षापूर्वीचा 'पट'एकदम डोळयांसमोर उभा राहिला. गेल्या आठ वर्षात काय—काय घडलं असेल आमच्या सगळयांच्या आयुष्यात. नाटकाचं'वेड' मनात घेवून परिस्थितीला 'पराभूत'करायला निघालेली आमची दोस्त मंडळी आज काय करत असतील? अजूनही त्यांच्या डोक्यात 'नाटकचं' असेल काय?त्यामधले काही जण 'प्रयोगिक' आणि'व्यावसायिक' रंगभूमीवर आज सुध्दा 'तग'धरून असल्याचे समाधान वाटते आहे. एकांकिकेच्या त्या काळात मन रमलं. एक—एक घटना आज घडल्या सारखी समोर येत होती. विचार करत होतो की, आज काय अवस्था असेल नाटकवाल्या मंडळीची? अनुकूल वातावरण असेल का?पैसे मुबलक असतील का? कलाकार कसे असतील? पुन्हा—पुन्हा असा सगळा विचार करत होतो. त्याचं वेळेस रोकडे सरांचा पुन्हा 'मेसेज' आला. उदया 'रंगीत तालीम' आहे. तुला यायला जमेल का?त्यांना 'नाही' म्हणता आलं नाही. पण कामाचा व्याप म्हणून जाता ही आलं नाही. मग मात्र आम्हाला एकांकिका व नाटकाचं वेड लावणा—या 'हितेश दिवाडकर' या माणसाला फोन लावला.सवयीप्रमाणे 'तो' उचलला गेला नाही. पुन्हा केला पण पुन्हा ही उचलला गेला नाही. परंतु काही वेळाने 'त्यांचा'च फोन आला. मी मात्र फोन उचलला नि भरभरून बोललो. एकांकिके बद्दल विचारलं. जुन्या दोस्तांविषयी विचारलं. कॉलेजच्या नि एकांकिकेच्या अनेक गोष्टी ऐकून समाधान वाटलं. बदललेल्या काळात कॉलेजचा एकांकिका 'संघा'कडे पाहाण्याचा दृष्टिकोन सुध्दा 'अनुकूल'झाल्याचं हितेश सांगत होते. मला मात्र संकटांचा, अपु—या साधनांचा,नकारात्मक विचारांचा काळ आठवत होता....!!

 हितेशला तब्बल दिड—दोन वर्षांनी बोललो होतो. त्यांच्याकडूनचं अशिष टिळकचा नंबर घेतला. त्याला ही बोललो तब्बल तीन वर्षांनी. पण अशिष नेहमी सारखाचं विनोदी आणि गंभीर बोलला. 'प्रयोगा'ला या असं त्यानेही आग्रहाने सांगितलं आहे...त्याला ही 'हो'चं म्हणालोय...!!

    हे संगळ घडत असताना मला जुना काळ आठवत होता. 'आम्ही एकांकिका करणारचं' आणि 'शाहा—या'या दोन एकांकिकेच्या दरम्यान घडलेले सगळा प्रवास. जो प्रवास आयुष्याला ही एक वेगळं वळण देवून गेला. अनेक जीवाभावाचे मित्र जोडले गेले. सहकार्य,आदर, नम्रता, संयम, सकारात्मकता अशा अनेक गुणांचा विकास सुध्दा झाला. आनंद मिळाला. समाधान भेटलं. भांडण झाली. रूसवे—फुगवे झाले. अडचणी आल्या. अपमान झाले. पण सगळयांना पुरून उरेल असा दांडगा आत्मविश्वास'टिम'मध्ये होता. म्हणून चांगलं काही करू शकलो. कमी बजेट, मुलींनी काम करू नये अशी घरची मानसिकता, यांना काय कामचं नाही? असं म्हणणारा एक वर्ग. प्रॅक्टिसला जागा नाही. हिशोबनीसां कडून नेहमीचं अडवणूक? अगदी शिपाई सुध्दा हसायचे. पण अशा ही वातावरणात'उजेडाची स्वप्ने' घेवून आमच्यातला प्रत्येक जण पुढे जात होता. हे स्पिरीट फक्त आणि फक्त 'परिस्थिती'ने दिले होते. मात्र या ही वातावरणात तेव्हाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शुभश्री काळे,प्रा.महादेव रोकडे, प्रा.प्रदिप जटाळ यांची तळमळ आजही प्रेरणा देते. सोबतचं प्रा.पी.बी.पुराणिक, प्रा.सीमा देशपांडे,प्रा.गौरीमाटेकर, प्रा.विनायक मोरे,ग्रंथपाल अरूण चव्हाण, लिपीक रामभाउ बारगजे, डामसे,  सेवक अंगद कानडे यांची झालेली मदत कधीचं विसरता येत नाही. प्रा.रोकडे सर तर 'बी पॉझिटिव्ह...डोन्टवेरी' असं म्हणून आत्मविश्वास दयायचे. महाविदयालयात उत्साह निर्माण व्हावा म्हणून आनंदाने'फलक लेखन' करायचे. प्रयोगाला यायचे. दिवस बदलतील याची हमी दयायचे....खरं तर एकांकिका, कला आणि कौशल्यां विषयी 'उपनगरात' जसा उत्साह नसतो तसाचं विचार'उपनगरातल्या महाविद्यालया' विषयी'आयोजकां'नी ही केलेला असतो. याची जाणीव पदोपदी होत असे. 'संघप्रमुख'म्हणून 'मिटींग'ला हजर झालो की हमखास याची प्रचिती येत असे. पण पोराचं स्पिरीट बघायचे नि रात्रीची मिटींग विसरून कामला लागायचो.

          तसं पाहिलं तर इतर महाविदयालयाकडे 'चेअरप' करायला तगडी टिम सज्ज असायची. पण आमच्याकडे बोटावर मोजता येतील इतकीचं स्नेही मंडळी. त्यामुळे आम्हाला'खालून' चेअरप मिळायचं नाही. खरं म्हणजे आम्ही एकांकिकेत काम करणा—या प्रत्येकाच्या मित्राने किंवा नातेवाईकाने तिकीट घेतलेले असायचे. फार—फार तर25 ते 30 तिकीटे खरेदी व्हायची. तिकीटांचा हिशोब घेवून 'भरत'ला गेलो तर गेटवर उभा असलेला 'वॉचमन' सुध्दा विचारायचा 'खडकी कॉलेज का?' मग मात्र निराशा वाटायची...पण करणार तरी काय?

   कॉलेज मधून 'प्रॉक्टिस'ला जागा मिळत नसायची. एकचं जिमखाना हॉल. तिथेही रोजचं एखादा कार्यक्रम असायचा. ज्या दिवशी हॉल मध्ये कार्यक्रम असायचा. त्या दिवशी तयारीचे तीनतेरा व्हायचे. मग अशिष, प्रशांत आणि हितेश ची धावपळ सुरू व्हायची. मग कधी लाल बहादूर शास्त्री विदयालयाचे प्रांगण, तर कधी बुध्द विहार, कधी राणी लक्ष्मीबाई उदयान, तर कधी ग्रंथालया समोरील मोकळी जागा. पण प्रॉक्टिस जोरदार व्हायची. अशा अवस्थेतून नाटकाची जास्तचं तळमळ असणारा 'राहूल झेंडे'एका माणसांशी कडाक्याचं भांडला होता. हे ही आज आठवत आहे.

    कॉलेज कडून अत्यंत कमी पैसे मिळायचे. त्यामध्ये सगळे बसवावे लागायचे. म्हणून कमी पैशात 'संगीत'करून मिळावे म्हणून मी, हितेश, अशिष आणि राहूल मुसळधार पावसात सुध्दा'गाडी नं 11' ने   अनेक 'स्टुडिओ'च्या पाय—या पालथ्या घालायचो. कमी बजेट आणि मुलांची मागणी जास्त त्यामुळे माझे आणि त्यांचे 'शीतयुध्द' सुध्दा होत असे. अनेकदा इच्छा असूनही मी पोरांना'वडापाव' शिवाय दुसरं काही खावू घालू शकलो नाही. त्याची 'खंत' आजही वाटत आहे. अशिषची इच्छा ब—याच वेळा'नॉनव्हेज'ची असायची. अशा वेळी मी प्रशांत आणि स्वप्निल ला पाठवून गरमागरम वडापाव मागवायचो. त्या गरमागरम वडापावमुळे अशिष ही'नॉनव्हेज' विसरून जायचा.
                        
                          सादरीकरण करताना'टिमवर्क' गरजेचे असते. सर्वांनी वेळेवर यावं. गंभीरपणे घ्यावं. या हेतून मी अनेकांवर 'रागवायचो' नंतर लगेच प्रेमाने बोलायचो. आणि एकत्र  येवून एकांकिकेचा विचार करायचो.
त्याचा परिणाम होवून आमचं 'आम्ही एकांकिका करणारचं' चा प्रयोग बराच गाजला. अपेक्षेप्रमाणे अशिषला'अभिनया'चं पारितोषिक मिळाले. नितीन चंदनशिवेची भूमिका विशेष गाजली. अर्थात 'टिमवर्क'चं ते यश होतं. यामध्ये हितेश दिवाडकरांच दिग्दर्शन, राहूल झेंडेचं संगीत, रोहित ढोरेची लाईटस आणि मंगेश कांबळेंच नैपथ्य या सगळया गोष्टी जुळून आल्या होत्या.

         नंतर 'शाहा—या' करताना इतक्या अडचणी आल्या नाहीत. टिम चांगली मिळाली. नव्याने काही मंडळी सहभागी झाली होती. त्यामुळे शाहा—या करताना अनेक गोष्टी सोप्या झाल्या. पण प्रॉक्टिसला जागा 'न' मिळणं तेव्हा ही कायम होतं. स्र्किप्ट सगळयांना पाठ झाली होती. कमी बजेट असल्यामुळे स्वत:चे दोन पैसे घालून किंवा घरची साधने वापरून खर्च कमी करण्यास मदत करू शकणारा पोरगा 'बॅकस्टेज' साठी शोधत होतो. अशातचं वर्गमित्र मंगेश कांबळे भेटला. त्याला 'बॅकस्टेज' प्रमुख करून मोकळा झालो. ज्या हेतून मंगेशला पुढे केलं होतं. तो त्याने पूर्ण ही केला. मंगेश खरं तर फार शांत माणूस, प्रेमळ मित्र, संवेदनशील विदयार्थी, माणुसकी जपणारा तरूण. मंगेश घरून पाच—पाच पोरांचा डब्बा घेवून यायचा. घरी चारचाकी वापरून कामे सोपी करून दयायचा. पदरमोड करून गाडीत 'प्रेट्रोल' टाकून मिटींग व इतर व्यवस्थापनाच्या कामासाठी हजर असायचा. त्यामुळे खूप काही कामे बिना पैशाचीच व्हायची. म्हणून कधी—कधी स्वत:चीचं पाठ 'थोपवून' घ्यायचो की मंगेशला पुढे करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचा फायदा झाला.
       टिम मधल्या एका—एका पोरांविषयी असंख्य आठवणी आहेत. प्रशांत दरोडे चांगला गुणी कलाकार. पण त्याला टिममध्ये घेण्याचा हेतू की त्याच्याकडे गाडी आहे. आणि फोन सुध्दा....आजच्या सारखं 'जिओ' तेव्हा नव्हतं. त्यामुळे आमच्या टिमसाठी'अनलिमिटेड संवाद साधण्यासाठी मोबाईल देणारा' प्रशांतचं आमचा 'जिओ'किंवा 'फोरजी' झालचं तर 'मुकेश अंबानी'होता....!!
        'शाहा—या'च्या वेळेस आम्ही एक गोष्ट केली होती की, मी आणि मंगेश व चंदनने एन.एस.एसच्या मित्रांना'चेअरप'साठी येण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देवून अनेक मित्रमंडळी'शाहा—या' बघायला आली होती. आम्ही'बॅल्कआवूट' मध्ये सेट उभारत होतो नि खाली'आव्वाजकुणाचा.....टिजे..टिजे...टिजे...हिप..हिप..हुर्रे..अशा घोषणांनी 'भरत'दणाणून गेलं होतं. दुसरं म्हणजे आमची तळमळ बघून महाविदयालयाने प्रत्येकी130 रूपये व आम्ही प्रत्येकी 100 रूपये घालून पुढे कॉलेजचे नाव असणारे 'टि शर्टस' छापून घेतले होते. त्यावर मी आणि काळे मॅडमने विचार करून 'विस्तारणारी क्षितीजे...उंचावणा—या आशा...असे आम्ही टिजेन्स' असा संदेश पाठीमागे टाकून घेतला होता. त्यामुळे ही टिम मध्ये उत्साह होता..!!
          टिम मध्ये असणा—या प्रत्येकाच्या असंख्य आठवणी आहेत. प्रत्येकाने दिलेला आदर, सन्मान आज ही स्मरणात आहे. अशिष टिळक, हितेश दिवाडकर, नितीन चंदनशिवे, प्रशांत दरोडे,विशाखा भालेराव, राहूल झेंडे, आनंद शिंदे, तुषार निघोजकर, विशाल देवकुळे,प्रिया चव्हाण, वाजेद बेग, स्वप्निल, सागर जावळे,  क्षितीजा सावंत, संदीप आठवले,मयुर गजरमल, अमोल कांबळे, अश्विनी पाटोळे, अफरीन पठाण, रोहित ढेरे, प्रेम सोनवणे, मंगेश कांबळे, आरती नरळे अशी खूप मोठी मित्र मंडळी नाटकाच्या माध्यमातून जोडली गेली होती.'संघप्रमुख' असल्या कारणाने अनेकांवर रागवावे लागत असे. पण मनात कोणतीचं'कटुता' नव्हती हे मात्र नक्की..!!
  मागे वळून पाहाताना 'तो'काळ फारचं कठीण वाटतोय. पण आज निर्माण झालेली सकारात्मक खूपचं बळ देणारी आहे. महाविदयालयात तयार झालेलं 'अनुकूल' वातावरण हि चांगली बाब आहे. अशिष सांगत होता की,महाविदयालयातील प्रत्येकाचा एकांकिका संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारचं बदलला आहे. आता सगळे नाटकची आस्थेनं चौकशी करतात. मला व हितेशला 'सन्मानाने' बोलवलं जातं. प्रा.महादेव रोकडे सर 'सांस्कृतिक विभागप्रमुख' झाल्या पासून त्यांनी वातावरण बदलायला खूपचं प्रयत्न केले आहेत. आता ग्रंथालयाच्या समोर नाटकाच्या 'प्रॅक्ट्रिीस'साठी स्वतंत्र 'हॉल'आहे. सगळं कसं छान आहे....अशिष फोनवर सांगत होता..नि मला फार आनंद होत होता..तेव्हा मला प्रा.महादेव रोकडे सरांच वाक्य आठवयला लागलं की, हे दिवस जातील..दिवस काही घर बांधून राहत नसतो...!
             सामाजिक समतेची चळवळ पुढे घेवून जाणा—या साहित्यिकांमध्ये अण्णा भाउचां समावेश होतो. त्यांची'मरीआईचा गाडा' हि कथा विज्ञानवादाचा पुरस्कर करते. त्यातील 'नाना' नावाचे पात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अंधश्रध्दा बाळगणाऱ्यांना 'चपराक' देतो. त्या दृष्टिकोनातून हि एकांकिका फारचं महत्वाची आहे. याची जाणीव 'परीक्षक'आयोजक आणि प्रेक्षकांना झाल्याशिवाय राहाणार नाही. असा आशावाद वाटतो आहे. बाकी विजय आणि पराजयात न पडता हि एकांकिका 'टॉप नउ' मध्ये येईल यात कोणतीचं शंका नाही...!!
         आता थोडं आताच्या नव्या'संघासाठी' की आपण एकजुटीनं राहा. ऐकमेकांविषयी आदर ठेवा. सकारात्मक राहा. 19 तारखेच्या प्रयोगाला भेटूचं. पुन्हा एकदा एकांकिका प्रयोगाला मनपूर्वक शुभेच्छा....!! तुम्हा सर्वांना चेअरप करण्यासाठी आम्ही सगळे येत आहोत.....
आव्वाजकुणाचा....टिजे....टिजे...टिजे...टिजे...टिजे...टिजे....!!
साहीर सुधीर लुधीयानवी लिहितो की,

 कौन कहता है की
आसमान में छेद नहीं होता
एक पत्थर तो 'तबीयत' से उचालो यारो...!!

 

 धनंजय झोंबाडे   
 माजी विदयार्थी 
टिकाराम जगन्नाथ महाविदयालय
खडकी, पुणे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें