रविवार, 13 जून 2021

मनातलं काही....


 निकाल हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. आयुष्यातल्या अनेक सकारात्मक घडामोडी या निकालाशी निगडीत असतात. त्यात उद्या पाच राज्यांचा निकाल आहे. तर असो, पण... मी आपल्या निकाला विषयी बोलतोय. अर्थात सर्वस्पर्शी फाउंडेशनच्या भाषण (वक्तृत्व) स्पर्धेच्या निकाला विषयी....
तर आज स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यात विजेते ठरतील. मात्र माझ्यासाठी तर सहभागी सगळेचं स्पर्धेक विजेते आहेत. अगदी 53 च्या 53. हो गुजरातचा स्पर्धेक सुध्दा विजेताचं आहे....
त्यामुळे मी सहभागी सर्व स्पर्धेकांचं *मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. कोरोनाच्या महामारीत अवघं जग सापडलं आहे. देवळां पासून ते शाळांपर्यंत टाळेबंदी करण्याची वेळ आपणांवर आली आहे. त्यामुळे पुस्तक-पाटीपासून मुलं दूर जाताहेत. आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली 'पुढचं पाठ मागचं सपाट' असं चित्र तयार झालंय. कधी नव्हे ती इतकी मोकळीक मुलांना मिळालीय. म्हणूनचं ते सगळेचं छंद जोपासताहेत. डोरोमँन ते पोकोमँन यांची मुलांसोबत चांगलीचं गट्टी जमलीय. जोडीला सापसीडी, लुडो, पब्जी, थ्री फायर, झोंबी, कार पार्किंग अशी भलीमोठी लिस्ट आहे. असं हे वातावरण तयार होत असल्याचं काळात सर्वस्पर्शी फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं एक अभूतपूर्व उपक्रम आयोजित करून तो यशस्वी सुध्दा केला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू पोखर्णीकर, उपाध्यक्ष गुरूवर्य प्रा.डॉ.महदेव रोकडे, सचिव गुरूबंधु प्रा.समिंदर घोक्षे यांच्यासह राबलेल्या प्रत्येक हातांचे मनापासून आभार....
कोरोना काळ लक्षात घेवून मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी हा शब्दपंढरीचा यज्ञ (वक्तृत्व स्पर्धा) आयोजित करण्यात आला होता. त्यात वैखारीचे अनेक वारकरी आनंदाने सहभागी झाले. त्या वारकऱ्यांनी प्रगल्भ शब्दांच्या समिधा वाहिल्या. त्या वारकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा आजचा दिवस. शिवखेरा म्हणतो की, आयुष्यात विजय होईल किंवा पराजय पण पाऊल पुढं टाकण्यात खरा विजय दडलेला असतो, हा विचार सहभागी चिमुकल्यांनी व त्याच्या आई-वडीलांनी लक्षात घ्यावा. आपल्या खूपचं छान प्रयत्न केलेत. मी स्वतः काही व्हिडीओ पाहिलेत. परंतु जय-पराजयाचे काही निकष असतात. सुरूवात, हावभाव, स्पष्टीकरण, सभाधीटपणा, आत्मविश्वास, उच्चारणं, मांडणी, शेवट असे काही मापदंड असतात. त्यात कमी जास्त प्रमाण असते. त्यामुळे काही विजेते ठरत असतात. पंरतु त्यामुळे नाउमेद व्हायचे नसते. हरायचे नसते. खचून जायचे नसते. तर कविवर्य भटांच्या शब्दांत...
 'प्रत्येक वादळ पेलवीन मी
 माझ्यात आत्मविश्वास आहे,
 पायाखाली जमिन...
 पाठीवरती आभाळ आहे,
 जाऊन सांगा त्या वादळांना 
 आता माझ्याशी गाठ आहे...
असे आव्हान द्यायचे असते. निर्धारपूर्वक लढा द्यायचा असतो. कारण लक्षात ठेवा, अपयश दु:ख पचविल्या शिवाय यशाची चव चाखता येत नाही.चार्ली चँपलिनची 39 नाटके फेल गेल्या नंतरचं 40 वे नाटक गाजले होते. त्यामुळे खिलाडूव्रत्तीने विजेत्यांचे अभिनंदन करूया. जिंकण आणि हरणं हा केवळ तीन अक्षरांचा खेळ आहे. मात्र यातूनचं आयुष्याला कलाटणी मिळत असते. परंतु जिंकलेल्यांनी सुध्दा विवेकी राहायला हवं. अगदी जमिनीवर. कारण हरलेले होते म्हणूनचं तुमच्या जिंकण्याला अर्थ आहे. त्यामुळे सहभागी सर्वाचेचं मनपूर्वक अभिनंदन...
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक दिवा ज्ञानाचा - एक दिवा संविधानाचा होय. या दोन्ही महापुरूषांच्या जंयती दिनानिमित्त आपणाला आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळालीय यातचं तुम्ही जिंकलात....!!!
सगळेजण स्पर्धेचा आनंद घ्या. लहानपणी मी सुध्दा राजर्षी शाहू महाराज जंयती च्या वेळी एका स्पर्धेत बोललो होतो. बक्षिस मिळालं नव्हतं पण दांडगा आत्मविश्वास मिळाला होता. पुन्हा सातत्याने बोलत राहिलो. कधी जिंकलो तर कधी हरलो. हजारो स्पर्धा केल्या. कधी राज्यात तर कधी राज्या बाहेर. हजारो जिंकल्या शेकडो हरल्या. मात्र प्रत्येक वेळी नव्याने सुरूवात केली. पण त्यातून बरचं काही शिकता आलं. चांद्या पासून ते बांद्यापर्यंत मित्र परिवार मिळाले. नावं झालं. कौतुक झालं. पण नेहमी जमिनीवर राहिलो. निकालाचा आदर केला. संयोजक आणि परीक्षक यांच्याशी कधीचं वाद घातला नाही. नेहमी सकारात्मक राहिलोय....
आज महाराष्ट्रभर व्याख्यानं करतोय. नामांकित स्पर्धांना परीक्षक बसतोय पण सारं काही पारदर्शक. हे सारं आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ.महादेव रोकडे यांच्यामुळे शक्य झालं. अनेकवेळा खिशात पैसे नसतानाही काँलेजचे पत्र आणि शर्टच्या वरच्या खिशात पैसे टाकून सरांनी महाराष्ट्राभर स्पर्धांना पाठविले. मी स्पर्धा जिंकल्यांचा आनंद माझ्यापेक्षा सरांनाचं अधिक व्हायचा. जिंकून काँलेजला पोहचण्यापूर्वी सरांनी त्यांच्या वळणदार अक्षरात अख्खा फळा रंगविलेला असो. त्यातं माझं टोपलंभर कौतुक. त्यामुळे काळीज सुपाएवढं मोठ्ठं व्हायचं....
हे सगळं कौतुक म्हणून लिहित नाही तर... निकाल काय असतो. किंवा त्यांची उत्सुकता काय असते, हे मला चागलंचं ठावूक आहे. निकालाच्या उत्सुकेतेपोटी आम्ही मान्यवर पाहुण्यांची (बक्षीस वितरणाची) भाषणं टाळ्यांनी अगदी हानून पाडलीत. तरीही सांगतोय की, सहभागी सर्वचं स्पर्धेक विजेतेचं आहेत.... 
स्पर्धेला परिक्षक म्हणून बसल्यावर खूप काळजी घ्यावी लागते. स्पर्धेकांच्या शंका- कुशंका आणि प्रश्नांना स्पष्टीकरणासह उत्तरे द्यावी लागतात. निकाल पारदर्शक लावावे लागतात. तरीही काहीचं समाधान होत नाही. त्याचं वाईटही वाटतं.... 
लाँकडाऊनच्या काळात असाचं काही स्पर्धांना संयोजकांच्या विनंतीवरून परिक्षक झालो होतो. व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहून निकाल लावले. शाळकरी मुलांची भाषणं ऐकून आनंदही वाटला. पण निकाला नंतर वाईट प्रतिक्रिया अनुभवयास मिळाल्या. कोणत्याही पालकांचं (आई-वडीलाचं) आपल्या मुलावर-मुलीवर खूपचं प्रेम असतं. खूपचं कौतुक असतं. त्यातून माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजेचं ग्रेट. दुसरं कुणी त्याच्या सारखं नाहीचं, हि भावना वाढते. त्यातूनचं काही पालकांनी चुकीचा विचार केला. संयोजकाच्या जवळच्यांना बक्षिसं दिलीत. पाहुण्यांना नंबर दिलेत. ओळखीच्यांना प्राधान्य दिलंय. गावातले जपलेत. शेजाऱ्यांना झुकतं माप दिलंय. पालकांच्या ओळखीमुळे मुलाला बक्षीस दिलंय. असो अशा किती तरी प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातून निरपेक्षपणे स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांचे मनोबल खचते. त्यांना वाईट वाटते. दु:ख होतंं. याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलं खिलाडू असतात पण काही पालक त्यांना स्पर्धेक करतात. त्यांच्या आडून नाहक प्रश्न उभे करतात. ज्यामुळे परिक्षक ही दुखावले जातात. पण लक्षात ठेवा, परिक्षक सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावभावना आहेत. त्यालाही परिवार आहे. त्यालाही मुलं, पुतणे, भाचे आहेत. तो तुमच्या मुलांवर अन्याय कशाला करेल??? 
असो, या सगळ्यांचा विचार करून आजच्या निकालाचा आनंद घ्या. मुलांना आणखी तयारी करायला लावा. पहिल्यादाचं भाषणं केलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका. मुलांना वाचण्यासाठी चांगली पुस्तके द्या. दुसऱ्यांच्या मुलांचेही कौतुक करूया..... सर्व स्पर्धेकांचे मनपूर्वक अभिनंदन करूया....
 आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ. महादेव रोकडे सर यांनी 2008 साली त्यांचा 'थोडं ऊन थोडी सावली' हा कविता संग्रह भेट दिला होता. त्यातल्या कविता अनेक स्पर्धांमधून मी महाराष्ट्राभर मांडल्यात. त्यामुळे माझ्या मनातला 'ऊन-सावली' चा कवडसा या स्पर्धेच्या निमित्ताने मांडलाय. आपण तो गोड मानून घ्यावा...
 सर्वांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा....
शेवटी बाबा आमटेंच्या शब्दांत  इतकचं की, 
 श्रंखला पायी असू दे
 मी गतीचे गीत गाई,
 दुःख उधळावयास आता
 आसवांना वेळ नाही....

©️ धनंजय झोंबाडे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कवीमनाचा माणूस...

शब्दांना अनुभवाची जोड देऊन कवेत घेताना वाचकांच्या मनाला भिडणारी जाणीवासंपन्न कविता लिहिणारे संवेदनशील, माणुसकीचं बोन्साय होत असताना हातातल्या कुंचल्याप्रमाणे माणसाचे बेगडी रंग ओळखून मानवतेसाठी झटणारे कवी, पोरांना दांडगा आत्मविश्वास देणारे कार्यकर्ते, लिहित्या हातांना बळ देणारा माणूस, जाती-धर्माच्या भिंती तोडणारा वाटसरू, प्रबोधन आणि परिवर्तनाच्या वाटेवरचा वाटाड्या, विद्रोह, व्यथा आणि वेदना टिपणारा सजग कलमवीर, संकटाच्या काळातही 'आत्मनिर्भर' राहिलेला माणूस झालचं तर 'कविताजीवी' माणूस, देश 'कँशलेस' नको तर 'कास्टलेस' करा हे ठणकावून सांगणारा साथी... आणि हो सदैव जमिनीवर राहाणारा अवलिया माणूस......
अशी कितीतरी मोठी ओळख असणारे आमचे मित्र, मार्गदर्शक, मितवा, वाटाड्या मा.श्री. Sunil Ubale  यांना वाढदिवसाच्या बक्कळ (अगदी ग्लोबल टेडर काढून) शुभेच्छा.....
असेचं लिहित राहा...नेहमी आनंदी राहा...
मनभरून जगा... तुमच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांना ट्रकभर सदिच्छा... पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
#HappyBirthday
कवितेचारंगारी
#कविताजगणारामाणूस

बोलत्या ओठांना बळ देणारा माणूस - प्रा.डॉ. पांडूरंग कंद


अरे..तुम्ही खूप छान बोललात. संदर्भही छान दिलेत. पण या विषयावर असंही बोलता आलं असतं. हे ही मांडता आलं असतं.  एखाद्या विषयाची तयारी करताना हे वाचा. मी काय म्हणतोय..तुम्हाला यावर्षी  अमुक-तमुक विषयांवर बोलायचंय. त्यासाठीचे संदर्भ ग्रंथ आणि काही पुस्तके मी पाठवितो...अशी बरीच वाक्य माझ्यासह अनेक तरूणांना आणि तरूणींना ऐकविणारा वैखारीच्या वर्तुळातला अवलिया माणूस म्हणजे..निखळ...मनस्वी आणि स्वच्छंदी मनाचे आमचे मार्गदर्शक अभ्यासू संशोधक, प्रेमळ प्राध्यापक मा.डॉ. पांडूरंग कंद सर होय. समाज, साहित्य, कला, संस्कृती, लाइफस्टाइल अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टीकोनातून ते नेहमी मांडणी करीत असतात. गावखेड्यातल्या बोलणाऱ्या पोरांना नेहमीचं बळ देवून त्याच्या पाठीमागे ते सदैव उभे आहेत. याची प्रचिती सहज कोणालाही येवू शकते. एखाद्याला मान-सन्मान देण्याची कला त्यांच्याकडून शिकली पाहिजे. 'हे असं करा किंवा असं करायला हवं...हे करता येईल...असं हक्काने सांगणारा माझ्या आयुष्यातला वाटाड्या, मार्गदर्शक, सोबती म्हणजे पांडूरंग कंद सर. त्याच्या पुढाकाराने आणि प्रेमळ वागण्यातून वाड्या- वस्त्यांसह गावखेड्यातल्या अनेक पोरांना बोलण्याचं बळ मिळो, सरांची झेप उंच जावो, याचं सदिच्छेसह Pandurang Kand सर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!!
🎂🎁🧁💐🎈🎊🎉

भूमिका घेणारा माणूस...

पुणे विद्यापीठात एम.ए ला असताना प्रा.डॉ.भगवान गव्हाडे सर होते. ते आधुनिक गद्य, आधुनिक पद्य आणि भारतीय साहित्य शिकवायचे. शिकवताना सतत गझलेचा किंवा चित्रपटांचा संदर्भ द्यायचे. त्यांचा आवाज सुध्दा घरंदाज गायकी प्रमाणे मंजुळ आणि सुरेख होता. मनोरंजातून साहित्य शिकवण्याची त्यांची कला विद्यार्थी वर्गावर प्रभाव टाकत होती. त्यामुळे ते विभागातील शिक्षकांसह ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके झाले होते. त्यात भर म्हणजे विद्यापीठाच्या 'फँकल्टी हाऊस' ला ते एकटेचं राहायचे. (त्यांचे कुटुंब औरंगाबादला होते.) त्यामुळे रात्री-अपरात्री त्यांच्या सोबत आमचे दिग्दर्शक मित्र जयशिल मिजगर, प्रमोद आव्हाड, Kumar Muthe  प्रफुल्ल कांबळे Nitin Mane  Sandeep Kale  Manohar Lote Dnyaneshwar Bagnar Kiran Sonwalkar Satish Harpade अशी मोठी मैफील रंगायची अगदी खुलके बात...खुल्लम खुल्ला इजहार..सर ही रोमँटिक होऊन गझला म्हणायचे. साहित्य, समाज, कला, मनोरंजन, चळवळ, अभ्यासक्रम, प्रेम, चित्रपट, गाणी अशी चौफेर चर्चा रंगायची. विद्यार्थी आणि शिक्षक  याच्या पलिकडचं नातं गव्हाडे सर आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं होतं. कोणत्याही विद्यार्थ्यांविषयी सरांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा जाणवायचा. विद्यापीठाच्या बाहेर अनेक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलनात सरांसोबत मी आणि जयशिलनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अगदी शनिवार-रविवारचे चित्रपट पाहाण्याचाही योग अनेकदा जुळून आला. 'कविता' करण्यात त्यांचा विशेष हातखंडा. त्यातूनचं 'आदिवासी विमर्श' हा कविता संग्रह आकारास आला. कितीतरी संगोष्टी आणि चर्चासत्रे मी आणि लाडके मित्रवर्य  प्रा.डॉ.अरूणकुमार सोनकांबळे, Ravindra Nirgude Patil  यांनी गव्हाडे सरांसोबत अनुभवलीत. त्यांची साहित्यिक मांडणी नेहमीचं भावली. पिशपाँन्ड, ट्रँडिशनल डेज, गँदरींग मध्ये तर सरांची फुल्ल टू धम्माल. 'चलाओं ना नैनोसे बान रे...' या गाण्यावर प्राँ.डाँ.महेश दवंगे आणि गव्हाडे सरांनी Devram Dagale  ला सोबत घेऊन केलेला डान्स अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. प्रो.डॉ.तुकाराम पाटील सर सेवानिवृत्त होताना गव्हाडे सर खूपचं भावूक झाल्याचेही आठवतंय. पुढे गव्हाडे सर पुणे विद्यापीठ सोडून औरंगाबादला 'घरवापसी' करीत असताना लिपीक शिवाजी कोकणे आणि Abhijeet Chobhe prakash Prakash M. Maghade  सुध्दा  भावूक झाले होते. एम.ए च्या निरोप कार्यक्रमसाठी लघुपट बनविताना गव्हाडे सरांचे बहुमोल मार्गदर्शन जयशिल नि मला मिळाले होते. त्यामुळेचं पुढे काही लघुपट करता आले. जयशिलने तर पुढे ग्रामीण प्रेमाचा कानोसा घेणारा ह्रदयस्पर्शी 'पाटील' नावाचा मराठी सिनेमा केला. असो तर....
गव्हाडे सरांच्यामुळे त्या वयात 'दुनियादारी' कळाली. ते नेहमी 'आजचा दिवस माझा' म्हणत सकारात्मकता शिकवित राहिले. त्यामुळे ते आम्हाला आमचे 'मितवा' वाटायचे. 'क्लासमेंट' आणि 'फ्रेंडस'ची जाणीव सरांनी आम्हाला करून दिली. त्या बळावरचं काहींनी 'प्यारवाली लव्हस्टोरी' साकार केली. 'पुणे मुंबई पुणे' हा प्रवासही त्यांच्या सोबत करता आला. त्याचं प्रश्नांशी 'धडाकेबाज' भिडणं मनाला नवी उमेद देऊन गेलं. अभ्यासाचा 'टायमपास' करू नका, नाही तर 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' करावा लागेल, याचीही जाणीव सरांमुळे झाली. आयुष्याचा 'नटरंग' होऊ द्यायचा नसेल तर 'आयत्या घरात घरोबा' होऊ नका, असा सल्लाही ते देत होते. 'अशी ही बनवाबनवी' टाळली तर माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठ्ठा होतो, यावर त्यांची विशेष श्रध्दा आहे. वाचण्या- लिहण्यातले संदर्भ जर जगण्यात आणता आले तर आयुष्य फारचं सुंदर वाटायला लागतं. असं त्यांनी खूपदा सांगितलंय. आम्हाला साहित्याकडे पाहाण्याची वेगळी नजर प्रो.डॉ. तुकाराम पाटील, प्रो.डॉ.भालेराव  Sadanand Bhosale Balasaheb Sonawane शशिकला राय, Prerana Ubale प्रा.डॉ.महेश दवंगे यांनी दिली पण काव्यातून साहित्याकडे बघण्याची कला गव्हाडे सरांमुळे मिळाली. त्यांच्या सहवासाने आमच्या जगण्यात  'सैराट'पणा आला. अगदी जगणंचं 'लय भारी' वाटू लागलं. सरांचा सहवास असाचं मिळत राहावा असं वाटत असतानाचं त्यांनी 'घरवापसी'चा अनाकलनीय निर्णय घेतला. आम्ही आदरापोटी त्यांची 'मन की बात' समजून घेतली. आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. तरीही संपर्क कायम आहे. सुख-दु:खाच्या अनेक गोष्टी, आयुष्यातले खचखळगे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येतात. त्यांच्याशी बोललं की मन हलकं होतं. आजही ते त्याचं आपुलकी आणि प्रेमातून सल्ले देतात. मार्गदर्शन करतात. विचारपूस करतात. मधल्या काळात 'कोरोना'शी दोन हात करण्याची लढाई ते निष्टेनं अगदी चिवटपणे लढले. लोकांचे प्रबोधन करीत राहिले. मदत करीत राहिले. तसेच 'माझं कुटुंब माझी जबाबदारी'ही सांभाळत राहिले. असा हा मुलखावेगळा माणूस.भूमिका घेणारा मास्तर. वास्तव मांडणारा कवी. जगतो तेचं बोलतो म्हणणारा वक्ता. आमच्या आयुष्यात आहे. याचा हेवा वाटतोय. तर या अवलिया माणसाचा आज वाढदिवस आहे. त्यांची सगळी स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. त्यांच्यातला माणूस असाचं गोड, मनस्वी आणि निखळ राहावा. आणि हो, आमच्या डोईवरचा हात असाचं कायम राहावा याचं सदिच्छेसह आदरणीय प्रा.डॉ.भगवान गव्हाडे Ajay Gavhade  सरांना वाढदिवसाच्या बक्कळ, मोक्कार, जबराट आणि ट्रकभर शुभेच्छा....!!
#जुगजुगजिओ
#सालगिराहमुबारक
#हँप्पीवालाबड्डे

मंगलवार, 15 सितंबर 2020

रांगेत या रांगेत...

*रांगेत  या......रांगेत..!!* 
====================
                  अनिकेतला म्हणजेचं मोठया भावाच्या मुलाला घेऊन उस्मानाबादला ‘जिल्हा रूग्णालयात‘ गेलो होतो. साथीचे आजार वाढल्यामुळे रूग्णालयात येणा-यांची संख्या नेहमीपेक्षा जरा जास्तचं दिसत होती. आठवडी बाजार किंवा यात्रा, जत्रा भरल्यासारखी तोबा गर्दी! जिकडं बघावं तिकडं माणसचं. लहान मुले, तरूण, महिला व जेष्ठ नागरिक असे सगळेचं रूग्ण उपचारासाठी आले होते. डाॅक्टरांच्या समोर ही भली मोठी रांग. त्यातून पाठीमागच्यांना डाॅक्टर ही दिसत नव्हते. त्यात ही पुन्हा विभागणी महिलांची व पुरूषांची वेगळी तपासणी रूम. तीला वैदकिय भाषेत ‘ओ.पी.डी‘ म्हणतात. इतर अनेक तज्ञ विभाग. पण एखादयाचं तज्ञ विभागात ‘डाॅक्टर‘ हजर. कान,नाक,घसा तज्ञांच्या बाहेर आठ-दहा रूग्ण उभे. मात्र डाॅक्टर राऊंडला गेल्याचे ‘सरकारी उत्तर‘ तयार.....
          प्रत्येक ठिकाणी ‘रांगेत या'...असं माणसं ऐकमेकांना सांगत होती. रांगे शिवाय दुसरं कायचं दिसत नव्हतं. बहुतेक सगळया विभागात रांगचं...रांग...ती हि लांबलचक..!! शेवटी प्रत्येक रूग्णाला रांगे शिवाय पर्याय नव्हता. रांग नि लोक असचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र रांगेत जेष्ठ नागरिकांचे हाल व्हायचे. म्हणून अबालवृध्द माणसं समोरच्याला ‘इंथ माझा नंबर आहे.' असं सांगून मिळेल त्या बाकडावर गर्दी करत होते. लहान मुलं रांगेत थांबून वैतागली होती. रांगेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
     शेवटी पुतण्याचा नंबर आला. डाॅक्टरांनी तापसलं. औषधे लिहून दिली. काय-काय पथ्य पाळा. हे एका मिनीटात सांगून मोकळं केलं. रांग मोठी असल्यानं डाॅक्टर ही रूग्णांचे ऐकून औषधे लिहून देत होते. हल्ली सरकारी डाॅक्टर फक्त लिहूनचं देत असतात. या ऐकलेल्या वाक्याचा मीच साक्षीदार ठरलो होतो. रांगेतून सुटलो या आवेशात मी औषधे मिळण्याच्या ‘काऊंटर‘वर आलो.....तर तिथे ही पुन्हा भली मोठी रांगचं! आता मात्र चक्रावलो. या रांगेतून सुटका नाही. अशी मनाची तयारी केली. नि रांगेच्या शेवटी जाऊन थांबलो. सोबत लहान पुतण्या ही रांगेतचं!
             औषधे मिळण्याच्या काऊंटर पासून रूग्णालयाच्या आवारा प्रर्यंत रांगने जागा घेतलेली. रांगेतली माणसं केव्हा मोकळा होतोय. याचाचं विचार करीत होती. औषधे घेण्यासाठी येणारा प्रत्येक रूग्ण ‘रांग‘ पाहून पुन्हा आजारी पडल्यासारखा चेहरा करत होते. रांग मात्र वाढतचं चालली होती. मी विचार करीत होतो कि, रांग मागूनचं  वाढतेय. पण पुढून कमी का होत नाहीय? तेव्हा लक्षात आलं. की रांगेतही ‘वशिलेबाजी‘ सुरू होती. येणारा माणूस ‘रांग‘ पाहून आपल्या ओळखीचा माणूस शोधायचा व त्याच्या जवळ औषधे घेण्याची चिठ्ठी देत होता. ओळखीचा माणूस ही अशावेळी धावून येत होता. नि चिठ्ठी घेऊन समोरच्याला दिलासा देत होता....
                येणारा रूग्ण रांगेत कुणी आपला ओळखीचा. कुणी नातेवाईक. कुणी मित्र. कुणी पाव्हणा. कुणी गाववाला. तर कुणी इतर माणूस शोधत होते. त्यामुळे रांगेच्या मध्य भागात असणा-या प्रत्येकाकडे किमान तीन-चार चिठ्ठया गोळा झाल्या होत्या. म्हणूनचं पुढची रांग सरकतचं नव्हती. आणि मागची लांबचं लांब होत होती. हा सगळा प्रकार मी जवळून बघितला. नि गर्दीतल्या काही माणसांना सांगितला. हे ऐकून एक वयोवृध्द आजोबा पुढे आले. त्यांनी मधूनचं वशिला लावणा-यांना मागे लावले. तिथे येणा-या प्रत्येकांना आजोबा सांगत होते. ‘रांगेत या...रांगेत...!! पण आजोबांची ‘नजर‘ चुकवून काही ‘महाभाग‘ रांगेत मध्येचं ‘वशिला‘ लावून घुसत होते. तर काही लोक ‘इमाने इतबारे‘ ओळख काढून चिठ्ठी हातात देत होते. हि ‘वशिलेबाजी‘ थांबल्या शिवाय आपला ‘नंबर‘ लागणार नाही. याची ‘जाणीव‘ झाल्याने मी हि पुढे झालो. आजोबांच्या संगतीनं सगळयांना सांगत होतो कि, ‘रांगेत या...रांगेत...!! 
पण समाज कुठेही ‘पळवाटा‘ शोधत असतो. अशीच पळवाट रूग्णालयाच्या रांगेतही लोकांना सापडली होती. त्यामुळे ‘रांगेत या...रांगेत‘ या आजोबांच्या विनंतीला कुणीही दाद देत नव्हतं. शेवटी औषधे देणा-या कर्मचा-यांकडे मी वळालो. तर तो औषधे देण्यात गुंग झाला होता. प्रत्येक रूग्णाची चिठ्ठी वाचून पेनाने राईट नि गोल करत होता. राईट केलेली औषधे दिल्याचे सांगत होता. सोबतचं ‘गोल‘ केलेली औषधे ‘बाहेरून‘ घ्या म्हणत होता. हल्ली सगळीचं औषधे रूग्णालयात उपलब्ध नसतात. पाच पैकी किमान तीन तरी बाहेरूनचं घ्यावी लागतात.  त्यांच्या समोर जाऊन खिडकीतूनचं नमस्कार केला. नि त्यांना सांगितलं की रांग फारचं वाढली आहे. रूग्णालयाच्या आवारात पोहचली आहे. पुढं वशिलेबाजी सुरू आहे. मागचा मागेचं राहतोय. तेव्हा माझी विनंती आहे कि, रांगेत येणा-यानांच औषधे द्या. माझ्या बोलण्यावर ते संतापले. आणि मलाच म्हणाले की, ‘वशिलेबाजी सुरू आहे. त्याला मी काय करू? तुम्ही मला का सांगताय? लोकांनाचं रांगेनं यायचं कळत नाही का? आता मी औषधे देऊ? का रांग लावीत बसू? तुम्हाला काय जातंय सांगायला? इंथ रोजचं असं होतंय......‘त्या‘ सरकारी कर्मचा-याचं ते ‘रोखठोक‘ उत्तर ऐकून ‘रांगेत या..रांगेत..‘ असं सांगणारे आजोबांही ‘निराश‘ झाले. शेवटी तो तरी काय करणार? कारण तो ‘सरकारी कर्मचारी‘ आहे. त्यानं तसचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याशिवाय तो ‘सरकारी माणूस‘ तरी कसा वाटणार. बहुतेक सरकारी कर्मचा-यांकडे कमी-जास्त प्रमाणात असाच ‘रूबाब‘ बघायला मिळतो. अर्थात याला अपवाद नाहीत असं नाही. पण त्यांची संख्या कमी आहे. हे मात्र सत्य आहे. 
                 खरं तर औषधांच्या ‘त्या‘ रांगेची काळजी घ्यायला तिथं एक ‘सुरक्षारक्षक‘ असायला हवा होता. पण सगळे सुरक्षारक्षक नको ‘त्या‘ ठिकाणी दिसले. आवारात गाडया नीट लावा, हे सांगण्यासाठी किमान पाच सुरक्षारक्षक बसले होते. पण रांग नीट लावा हे सांगण्यासाठी कुणीही सुरक्षारक्षक उपलब्ध नव्हता. औषधाच्या या रांगेजवळचं एक छोटीसी काचेची केबीन होती. त्यावर ‘ठळक‘ अक्षरात लिहिलं होतं कि, ‘मे आय हेल्प यू‘ याचा अर्थ ‘सर्वसामान्यांना‘ कळावा म्हणून मराठीत ‘बोल्ड‘ करून लिहिलं होत....‘आपणांस मदत हवी आहे का?‘ मी आशेनं ‘त्या‘ केबीनकडे बघितलं तर...आत मध्ये कुणीचं नव्हतं. कुणाकडे मदत मागणार. परंतु ‘त्याचं‘ केबीन समोर काही माणसं कुणी तरी येईल याची वाट पाहत उभी राहिलेली दिसली. 
                 तसं बघायला गेलं तर रांगेच आणि सर्वसामान्य माणसाचं जुनचं नातं आहे. नि त्या नात्यानं किमान शतकाची तरी वाटचाल केली आहे. रांग नि माणूस या समीकरणानं अनेक क्षेत्र व्यापली आहेत. ‘रेशन‘च्या दुकानात रांग. ‘राॅकेेल‘च्या वाटपात रांग. ‘राजीव गांधी‘ योजनेच्या पगाराची रांग. ‘रमाई आवास‘ योजनेच्या लाभासाठी रांग. ‘कर्जमाफी‘चे अर्ज भरण्यासाठी रांग. ‘विमा‘ भरण्यासाठी रांग. ‘स्कूल चले हम‘ म्हणणा-या पोरांच्या खिचडीची रांग. ‘शिष्यवृत्ती‘च्या चेक वाटपाची रांग. ‘वसतीगृह‘ प्रवेशासाठी रांग. ‘इंग्लिश मिडियम‘च्या प्रवेशाला रांग. ‘विद्यापीठा‘त प्रवेशाची रांग. ‘हागणदारी मुक्ती‘च्या योजनेचा चेक घेण्यासाठी ग्रामपंचायत बाहेर रांग. ‘पेन्शन‘ धारकांची रांग. ‘जात प्रमाणपत्र‘ काढण्यासाठी तहसील बाहेर रांग. ‘मोफत शिक्षणा‘ची पाठयपुस्तके मिळवण्यासाठी शाळेत रांग. ‘शिक्षकांच्या बदल्या‘साठी नेट कॅफे बाहेर रांग. ‘मनेरगा‘चा पगार घेण्यासाठी रांग. मध्यतंरी ‘नोटाबंदी‘ नंतर तर ‘रांग‘ फारचं चर्चेत आली होती. एटीएम बाहेर रांग. बॅकेत रांग. रात्र-रात्र रांग. आणि या रांगेनं काही ‘बळी‘ही घेतले. तेव्हा एक राष्ट्रीय नेते असं म्हणाले होते कि, रेशनच्या रांगेत ही लोक मरतातचं की! आणि या रांगेनचं ‘देशभक्ति‘ची नवी व्याख्या जन्माला घातली. रांगेत निमूटपणे उभे राहणारे ‘खरे देशभक्त‘ आणि रांग आहे म्हणून संताप व्यक्त करणारे ‘देशद्रोही‘ असं म्हटलं जातं होतं. तर अशी ‘भयानक‘ आहे रांग. कारण ती कधी काय जन्माला घालेल हे सांगता येत नाही. रांगेतूनचं राग, संताप, चिडचिड, निराशा जन्माला येते. झालचं तर रांगचं ‘व्यवस्था विरोध‘ वाढवते. रांगचं माध्यमांना ‘ब्रेकिंग न्युज‘ देते. मागे पैठणच्या एका शेतक-यांचा मृत्यु ‘सोयाबीन‘ नोंदविण्याच्या रांगेत झाला. नि त्यातून आरोपांचं ‘राजकारण‘ सुरू झालं. पुन्हा बातम्या...पुन्हा ब्रेकिंग न्युज....पुन्हा स्पेशल रिपोर्ट...पुन्हा ग्राऊंड रिपोर्ट...पुन्हा तेचं ते...
 पण ‘सरकार कुणाचंही‘ किंवा ‘कोणतंही‘ असो रांगेचे प्रश्न तेचं. रांगेची अवस्था तशीचं. रांगेचा संताप तोच. अक्रोश तोच....म्हणूनचं रांगेतूनचं योजना पुढे येतात. रांगेतून राजकारण जन्माला येत. रांगेतून घोषणा येतात. 90 च्या दशकातही रांगेतूनचं ‘गरीबी हटाव‘ घोषणा पुढे आली. लोकांनी भरपूर ‘मतं‘ दिली. पुन्हा रांग तशीचं. 2014 पुन्हा ‘गरीबी हटाव‘ ला आधुनिक नावं मिळालं ‘अच्छे दिन‘ पुन्हा त्यानांही भरपूर ‘मतं‘ मिळाली. पुन्हा रांग तशीचं. रांग अशीचं आहे. तीचा अंदाज बांधता येत नाही. तीला संपविता येत नाही. किंवा म्हटलं तर तीचा वेध ही घेता येत नाही. सारं काही अनाकलनीय...
       ...तर मी सांगत होतो औषधांच्या रांगेचं. त्या आजोबांचा नि त्याच्याचं मागे माझा नंबर येईपर्यंत तब्बल 2 तास गेले होते. शेवटी मला नि आजोबांना औषधे मिळाली. आम्हा दोघांच्याही चिठ्ठीवर दोन-दोन औषधे मिळाली. बाकीचे तीन ‘गोल‘ करून ठेवली होती. ‘गोल‘ केलेली बाहेरून घ्या. असं सांगून ‘सरकारी‘ कर्मचारी मोकळा झाला. आम्ही औषधांचं ‘काऊंटर‘ सोडलं. माझ्याकडे दुचाकी गाडी होती. म्हणून आजोबांना म्हटलं कुठं सोडू? ते म्हणाले एस.टी. स्टॅन्डला सोडा. मी त्याना गाडीवर बसविलं आणि निघालो... आजोबा म्हणाले एस.टी.नं गावाकडं जाण परवडतं. अर्धे तिकीट हाय. घरी जातो नि पोराला चिठ्ठी देतो. राहिलेली औषधे एैतवारच्या बाजारला आला की पोरगा आणिलं. लै येळ झाला बघ. लोकं कशी वागतात बघ की....आजोबांना बस स्टॅन्डवर सोडून घरी आलो. केस कापण्यासाठी गावातल्या दुकानात गेलो. तर तिथेही रांग. केस कापणारा म्हणाला...'सहा नंबर आहेत पुढं'.... निमूटपणे 'होय' म्हणून बसलो. शेवटी रांग काय पिछा सोडायला तयार नाही. असं समजून म्हणातल्या मनात हसलो....    
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
                                        
©️ *धनंजय मोहन झोंबाडे.*
📝📝📝📝📝📝📝📝

अष्टपैलू अभियंता...अतिश ओहोळ..

अष्टपैलू  'अभियंता'.
---------------------
जिद्द,चिकाटी,मेहनत या ञिसूञीचा खरा अर्थ खूपचं 'व्यापक'  आहे. तो अर्थ माणसाला 'अनुभवातून' समजत असतो. पण या तिहेरी 'गुणां'चा उपयोग करून आपलं 'आयुष्य' सुकर केलेला आवलिया म्हणजे अतिश ओव्हाळ होय. मनात आणलं तर 'माणूस' काहीही करू शकतो. हा 'सिध्दांत' त्याने खरा करून दाखविला आहे. तो नेहमी म्हणतो की, यशस्वी होण्यासाठी 'सकारात्मक' असायला हवं. आयुष्यातल्या सुख दु:खाच्या  अनेक प्रसंगात त्याचा 'बाणेदार'पणा जवळून बघता आला.
शिक्षणासाठीचा त्याचा 'संघर्ष' आम्ही लहान वयापासून पाहतो आहोत. 'इंजिनिरिग'ला असताना अतिश सायकलहून महाविद्यालयात जायचा. खरं तर घर ते महाविद्यालय १० किलोमीटरचं अंतर तो भर उन्हात पावसात पार करायचा. रोज २० किलोमीटरचा ठरलेला प्रवास. पण त्यात त्याने कोणताही 'संकोच' बाळगला नाही. किंवा घरी तक्रार सुध्दा केली नाही. दहावी किंवा बारावी पास होण्या अगोदर फँशनबाज गाडी द्यावी लागते.हे घरच्याकडून  'कबूल' करून घेणारा आजचा काळ. या काळात अतिशचा 'सायकल' प्रवास बघून गावात प्रत्येकाला त्याचा 'हेवा' वाटायचा. आहे त्या परिस्थितीत लढलं पाहिजे. हा त्याचा बाणा आहे. अनेक 'अडचणी' वाट्याला आल्या. पण त्याने कधीचं बाऊ केला नाही.
कोणताही शैक्षणिक 'वारसा' घरात नसताना त्याने माञ शिक्षणाची कास धरली. त्याच्या शिक्षणाची टक्केवारी किंवा पदवीचा अर्थ अडाणी असल्यामुळे आई व वडिलांना कळत नव्हता. आमच्या सारख्या त्याच्या मिञांना ते विचारायचो तेव्हा आम्ही समजावून सांगायचो. आपला मुलगा किंवा मुलगी पाचवी सहावीला  गेल्यापासून त्याच्या मागे 'अपेक्षाचं' आेझं लादणार्यां पालकांमध्ये व अतिशच्या  आई वडिलांमध्ये 'फरक' आहे तो मानसिकतेचा. अडाणी असूनही त्याच्या आई वडिलांनी त्याला 'मुक्तपणे'  संचार करू दिला. त्याला हवा तो विषय घेऊ दिला. त्याला हव ते करू दिलं. महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं 'स्वातंञ्य' दिलं. पण अतिशनंही कधीचं स्वातंञ्याचा 'स्वैराचार' केला नाही. त्याने नेहमीचं आई वडिलांचा सोबतचं नातेवाईक, पाहुणे व मिञांचा आदर केला. आपुलकीनं 'संवाद' साधला आहे. अतिश विषयीचं आणखी एक नोंद घ्यावी लागेल की, कोणतीही 'शिकवणी'  किंवा सोकॉल्ड 'क्लास'  न लावता तो 'गेट' परीक्षा पहिल्या प्रयत्नात 'उत्तीर्ण'  झाला आहे. आपल्या 'जिद्दी'च्या बळावर पुढील शिक्षणासाठी राज्याच्या 'राजधानीत' धडक मारली. मुंबई नगरीच्या 'धावपळीत' तो सामिल झाला. व्ही.जी.टी.आय. मध्ये त्याने शिकण्या बरोबरचं शिकवणं सुरू केलं. त्याच्यातला 'शिक्षक'  आता अभिव्यक्त व्हायला लागला होता. विषय 'समजून' देण्याची त्याची 'पध्दत' सगळ्यांना आवडत होती. मुंबईनं त्याला खुप काही शिकवल्याचं तो नेहमी सांगत असतो.
दोन वर्षांच एम.टेक चांगल्या गुणांनी पूर्ण करून तो पुण्यात परतला. पुण्यात 'आमच्या' भेटी गाठी वाढल्या. मी पुण्याबद्दल तर तो मुंबईबद्दल बोलायचा. दिवस दिवसभर आमच्या 'गप्पा'  रंगायच्या. अन अचानक त्याने मांजरी हडपसरचं अण्णासाहेब आवटे इंजिनिरिग कॉलेज जॉईन केलं. तिथं 'शिकवू' लागला. रोज नवनवीन 'प्रयोग' केल्याने त्याला माननारा विद्यार्थी वर्ग निर्माण झाला होता. त्याच्या तासाला बसावं असं वाटणार्यांची 'संख्या' वाढत होती. त्याची शिस्त फार कडक होती.विद्यार्थ्यांना तो खडे बोल सुनवायचा.लवकरचं तो लोकप्रिय 'प्राध्यापक'  झाला. तो तिथे स्थिरावतो आहे. असं वाटत असतानाचं एका दिवशी त्याचा 'फोन' आला. कॉलेजला ये असं सांगितलं. मी तडक निघालो. पोहचलो व चौकशी करून त्याचा वर्ग शोधून काढला. पाहतो तो तर काय वर्गात चारचं पोरं. सगळा वर्ग या 'पट्यानं' हाकालून दिलेला. कारण काय तर 'प्रोजक्ट अनकप्लिट'. मला वाटू लागलं असा 'मास्तर' असला पाहिजे. गंडगंज फि भरली म्हणजे आपण वाटेल तसं वागू हि भावना निर्मांण झालेल्या इंजिनिरिंगवाल्यानां कुणीतरी सुनावणारा आहे. याचं 'समाधान' मला वाटत होतं. तो याचं क्षेञात 'मोठा' व्हावा असं वाटत असतानाचं जरा खाली जाऊन येऊ असं तो म्हणाला. आम्ही नेहमीप्रमाणे आवटे कॉलेजच्या मागे 'टपरीवर' गेलो. तिथं आमच्या नेहमीच्या चायवाल्याकडून अतिशनं 'चहाची' आँर्डर दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. चहा आला आणि अतिशनं बॉम्ब टाकला. मी 'राजीनामा'  दिलाय. अगदी थंडपणे त्यानं सांगितलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सॉलिट 'टरकलो' होतो. पण अतिश तेवढाचं 'कूल' होता. इन्फँक्ट त्याच्या चेहर्यांवर कधी नव्हे एवढा आनंद दिसत होता. अतिशचं ते ठेवणीतलं हासणं. अरे, पण असं तडकाफडकी? पुढं काय? माझा टिपकल मध्यमवर्गीय प्रश्न. माहीत नाही, अतिशचं बेफिकर उत्तर. अरे खरचं माहीत नाही. थोडा दिवस मस्तपैकी 'ब्रेक' घेतो.चेहर्यांवरील हास्याची रेषा बिघडू न देता तो सांगत होता. काहीही 'हातात' नसताना अतिशनं ए.जी.आवटे कॉलेज सोडलं. असा निर्णय घ्यायला सॉलिड 'डेअरिंग' लागतं बॉस.
पुढे तो 'फोर्स मोटार्स'ला जॉईन झाला. तिथंही तो नवनवीन 'प्रयोग' करत राहिला. त्याच्यात लपलेला 'इंजिनिअर' आता वेगळ्या स्वरूपाचं इंजिनिरिंग करत आहे. कुणी अडलं नडलं  तर अतिशचा 'आधार' तिथेही लोकांना वाटतो आहे. माञ त्याच वेळी 'सिनियर' म्हणून तो 'कडक' वागतो. म्हणजे मैञी बिञी सगळं ठिक, पण आधी नेमून दिलेलं 'काम' पार पाडायचं. कामचुकारपणा त्याला आवडत नाही. अगदी तुम्हाला सातच्या शिप्टला वेळेवर येणं जमत नसेल किंवा 'दांडी' मारायची असेल तर कसं बिनधास्त सांगायचं. पण 'खोटं'  बोललेलं किंवा टंगळमंगळ केलेली त्याला अजिबातचं खपत नाही. कुण्याच्या खांद्यावर हात ठेऊन काम काढून घ्यायचं, कुण्या शहाण्याला किती 'शब्दांचा'  मार द्यायचा आणि कुणाला चौदावं रत्न दाखवून काम करायचं, याचं त्याचं असं स्वत:चं 'लॉजिक' आहे. त्यामुळं सगळ्यांच्याच मनात त्याच्याबद्दल एक 'आदरयुक्त' दरारा आहे.
अतिशची धडाडी पाहूनचं 'फोर्स मोटार्स'ने त्याच्याकडे महत्त्वाची धुरा सोपविली आहे. तिथं तो स्वता:ची 'ओळख' निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.
दुसर्यांचं कौतुक करण्यात तो नेहमी आघाडीवर असतो. मी चिंचवडला कै.गोपीनाथ मुंडे राज्यस्तरीय विजेता ठरलो. तेव्हा त्याला झालेला आनंद विस्मरणीय आहे. माझ्या वक्तृत्वावर त्याचं फारचं प्रेम. माझ्या सभा, व्याख्यानांना तो नेहमी हजर असतो. 
आमच्यातला समान धागा म्हणजे क्रिकेटप्रेम. पण तो आमचा फोर्थ अम्फायर. त्याला जगातल्या सगळ्या क्रिकेट टिमचे खेळाडू माहीत आहेत. त्याची क्रिकेटविश्वा विषयीची माहीती अफाट आहे. आम्हाला सांगितलेला त्याचा अंदाज चुकतचं नाही. परवा दक्षिण अफ्रिकेसोबत आपण जिंकू. हा त्याचा 'विश्वास' खरा  ठरलाय. सामन्यानंतर मी 'फोन' केला. तेव्हा आता 'करडंकचं' भारताचा. असं तो म्हणाला आहे. त्याचं हे 'निरीक्षण'  खरं ठरेल यात शंकाचं नाही. वास्तविक पाहता आमचं 'क्रिडाप्रेम' हे फक्त क्रिकेट पुरत मर्यांदित. पण अतिश त्याला अपवाद आहे. तो क्रिकेट इतकाचं फुटबॉल व टेनिसचा चाहता आहे. पुन्हा तोच प्रकार तो जगातल्या सगळ्या फुटबॉल व टेनिसपट्टूना ओळखतो. तो लहानवयात क्रिकेट खेळायचा. 'जाग्याहून सिक्स' मारणारा खेळाडू अशी त्याची ओळख आमच्या गावात आहे.
स्वयंपाक करण्यात अतिश हात कुणीही धरू शकत नाही. त्याने बनविलेली 'भाजी' एखादा  आचारी लाजेल अशी असते. चिकन 'दम बिर्यांनी'  बनविण्यात त्याचा विशेष 'हातखंडा' आहे. असा कोणताचं मिञ नाही की, ज्याने अतिशच्या हातची 'बिर्यांनी' खाल्ली नसेल.
त्याच्यात 'संवेदनशील' मनाचा माणूस लपला आहे. लहान थोरांना तो 'आदर' देत असतो. मैञीची मनस्वी जाण असणारा अतिश 'मिञांना' फार जपतो. 
खरं तर इंजिनियर हे व्यावहारिक व व्यवासाईक असतात. त्यांना भाव भावना नसतात. असा आपला समज आहे. पण हा समज 'चुकीचा' असल्याचं अतिश आणि त्याच्या मिञांनी दाखवून दिलं आहे. आम्ही केवळ 'यंञाची'  किंवा 'मशिनची' भाषा समजत नाही. तर 'समाजाची' व 'माणुसकीची' भाषा समजतो. याचं भावनेतून 'समविचारी' मिञांना घेऊन 'ममत्व' फाऊडेशन ची स्थापना केली. या फाऊडेशनच्या माध्यमातून समाजाचा 'चेहरा' बदलण्याचं पाऊल ते टाकताहेत. दुखितांचे 'अश्रू' पुसताहेत. अंधाराला 'आव्हान' देताहेत. मनाच्या 'समाधाना'साठी झटताहेत. समाजात 'उजेड' करण्यासाठी लढताहेत......
माणूस म्हणून तो 'ग्रेट' आहेचं. पण मिञ म्हणून तर भलताचं 'गोड' आहे. परवा ऑफिसच्या कामानिमित्त चेन्नई व इंदौरला 'विमाना'नं जाऊन आला आहे. अतिशने मला  'फोन' करून विमानाने जात असल्याचं सांगितलं. आणि मी भूतकाळात रमलो. तासाला उशिर होईल म्हणून जरा लवकर सायकलहून कॉलेजला निघणारा १५ वर्षांपूर्वीचा अतिश आठवला. सायकलहून इंजिनिरिंग पूर्ण करणारा हा माणूस 'विमाना'तून प्रवास करतोय. याचं 'समाधान' वाटलं. त्याच्याविषयीचा 'आदर' अधिकचं वाढला.
शहरात राहूनही त्याचं 'माती' आणि 'शेती'वर खूप प्रेम. मी झोपत असतानाचं 'फोन' करून पाऊस, पाण्याबद्दल हमखास विचारणारं. 
सर्वांना समजून घेणारा. मिळून मिसळून राहाणारा अवलिया. त्याचं नाव अतिश.
त्याच्या सोबतच्या कितीतरी 'आठवणी' मनात घर करून बसल्या आहेत.........!!
हे सगळं लिहीण्याचं कारण म्हणजे या गोड, मितभाषी अष्टपैलू अभियंत्याचा आज 'वाढदिवस' आहे.
अतिश, दोस्ता तुझ्या सोबतचा स्नेह व मैेञी अशीचं राहिलं.
तुझी सारी 'स्वप्न' व 'इच्छा' आणि  'आकांक्षा'  पूर्ण व्हाव्यात. हिचं सदिच्छा........
मिञा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.👔💍🎂🍧
ता.क.- आता दम बिर्यांनीची पार्टी कधी देणार. 
©धनंजय मोहन झोंबाडे.
    हिंदी विभाग.
    साविञीबाई फुले विद्यापीठ. पुणे.
---------------------

मरीआईच्या नावानं चांगभलं...

मरीआईच्या नावानं चांगभलं...!!




 आव्वाज कुणाचा टिजे कॉलेजचा....हिप..हिप..हुर्रे..तरी पण..टिजे..टिजे..टिजे..मरीआईच्या नावानं चांगभलं...मरीआईच्या नावनं चांगभलं...असा जल्लोष पुन्हा एकदा 'भरत नाट्यगृहा'च्या प्रांगणात ऐकायला मिळाला. टाळया, शिट्टया, घोषणा, चेअरपने परिसर दणाणून गेला होता. आणि निमित्त होतं...टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय प्रस्तुत एकांकिका 'मरीआईचा गाडा' होय.
             'पुरूषोत्तम करंडक' म्हटलं की, जल्लोष, घोषणा, आनंद, उत्साह या गोष्टी परंपरेने आलेल्या आहेत. टिकाराम जगन्नाथ कॉलेज 2007 पासून 'एकांकिका' स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. त्याची ही एक अजब कहानी आहे. 2004 ते 2006 या काळात महाविदयालयात शिकत असणा—या हितेश दिवाडकर, सुनील जावीर, भरत बगाडे अशा 'अभिनयप्रेमी' पोरांना पथनाटय, एकांकिका, एकपात्री व नाटक बघून त्याविषयी आवड निर्माण झाली होती. इतर महाविदयालयां प्रमाणे आपण ही त्यामध्ये सहभागी व्हावे असं त्यांना वाटत होते. त्याच भावनेतून या सगळया समविचारी पोरांनी 2006 ला हितेश दिवाडकर व सुनिल जावीर लिखित 'स्त्रीभ्रृणहत्या' हे सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारे एक 'पथनाटय' सादर केले. त्या पथनाटयाला भरपूर प्रसिध्दी मिळाली. सोबत 'पारितोषिक' सुध्दा मिळाले. हिचं घटना महाविदयालयात अभिनय कला रूजविण्यास कारणीभूत ठरली. त्या अगोदर ही महाविदयालयात अभिनयप्रेमी मुलं होती. पण हा 'सांघिक' प्रयत्न होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुढे 2007 मध्ये बळीराजाचं जीवन अधोरेखित करणारी सुनील जावीर लिखित 'बळी' हि एकांकिका प्रथम 'सकाळ करंडक' मध्ये सादर करण्यात आली. त्यानंतर याचं प्रश्नावर सुनील जावीरने 'प्रश्न' हि एकांकिका लिहिली नि ती सुध्दा पुन्हा 'सकाळा करंडक'लाचं सादर झाली. या संघात हितेश दिवाडकर, सुनील जावीर, भरत बगाडे, प्रिया चव्हाण, निलेश कांबळे, सत्यवान पवार, कृष्णा घाडगे अशी तगडी पोर होती. 2008 मध्ये हरहुन्नरी कलाकार आणि लेखक असणारा अशिष टिळक या 'मंडळात' सहभागी झाला. पुढे प्रशांत दरोडे, सागर जावळे, तुषार निघोजकर, क्षितीजा सावंत, अफरीन पठाण, संदीप आठवले, अमोल कांबळे, रोहित ढेरे, अश्विनी पाटोळे, विशाखा कांबळे, आनंद शिंदे, मयुर गजरमल, स्वप्निल, मंगेश कांबळे अशी अनेक कलागुणांनी परिपूर्ण असणारी मंडळी एकत्र येत गेली. त्यातचं 2009 ला 'तंत्रज्ञाना'ची जाण असणारा राहूल झेंडे आमच्याशी जोडला गेला. 2009 ते 2012 या काळात त्याचं 'उत्साहाने' एकांकिका सादर झाल्या. बळी, प्रश्न, अॅंटेन्शन प्लीज, आम्ही एकांकिका करणार, शाहा—या, आॅफ पिरीयड, भेळ हि नावे असलेल्या आणि विविध समस्यांवर प्रकाश टाकणा—या 'एकांकिका' सादर झाल्या होत्या. पण 2012 नंतर मात्र काही कारणाने या एकांकिकेच्या गाडीला 'ब्रेक' लागला. त्यानंतर तब्बल 5 वर्षानंतर 'मरीआईचा गाडा' मोठया जल्लोषात सादर झाली. एकूणचं काय तर 'बळी ते मरीआईचा गाडा' हि एक संघर्षगाथाचं आहे. असं म्हणायला काहीचं हरकत नाही...!
                     19 आँँगस्टला सायंकाळी झालेला 'मरीआईचा गाडा' हा प्रयोग किती तरी आठवणी आणि प्रसंगांना उजाळा देणारा ठरला. पुन्हा एकदा 'टि.जे'च्या स्पिरीटची चर्चा झाली. यावेळी मात्र वातावरण खूपचं 'सकारात्मक' होतं. एकांकिकेचा विषय नेहमी प्रमाणेचं 'सामाजिक' होता. अण्णा भाऊ साठेंच्या कथेवरील हि एकांकिका 'विज्ञानवादा'चा पुरस्कार करणारी ठरली. गावगाडयातल्या व्यवस्थेवर भाष्य करणा—या या 'प्रयोगा'ने सर्वांचीचं मने जिंकली. वाहवा झाली. चर्चा झाली. त्यामुळे 'टिम टिजे'चा आनंद व्दिगुणित झाला आहे. या आनंदात अशिष टिळक, हितेश दिवाडकर, भरत बगाडे, प्रशांत दरोडे, राहूल झेंडे, संदीप आठवले, सागर जावळे, स्वप्निल, विनय, अमोल कांबळे, प्रेम सोनवणे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. 
               एकांकिका संपल्या नंतर बाहेर खूपचं सकारात्मक चर्चा ऐकायला मिळाली. रास्ते सर व इतर सर्व जण खूप कौतुक करत होते. या निमित्ताने एका गोष्टीची नोंद घ्यावी लागेल की, पहिल्यादाचं संस्थेचे सर्व पदधिकारी 'प्रयोगाला' हजर झाले होते. त्यामध्ये खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलास पंगुडवाले, चिटणीस आनंद छाजेड, प्राचार्य अरूण मोकाशी सर,यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सोबतचं सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे सर, प्रा.गौरी माटेकर, डॉ.वीना मनचंदा, प्रा.रूपाली अवचरे ही हजर होते. 
      संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सांस्कृतिक क्षेत्राची जाण आहे. ते स्वता: अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आहेत. प्रयोग पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. त्यांनी आनंदाने सर्व कलाकारांना आपुलकीने चर्चा केली. सगळयांना चहापाणी केलं. आणि किमान एकदा तरी 'पुरूषोत्तम करंडक' आपला झाला पाहिजे हि इच्छा बोलून दाखविली. त्यातून कलाकारांचा हुरूप प्रचंड वाढल्याचे जाणवले. 
        आता थोडसं एकांकिके बद्दल...'मरीआईचा गाडा' हि अण्णा भाऊ साठेंची मुळकथा. ती साधारणता:ह 1956 ला लिहिली गेली आहे. अंधश्रध्देवर प्रहार करणारी हि कथा 'नाना' या धडपडया तरूणाला नायक म्हणून समोर आणते. या मुळ कथेचा विषय न सोडता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका साकारली गेली आहे. आजच्या पिढीच्या संवादाची भाषा त्यामध्ये वापरण्यात आली आहे. विशेष करून 'चिंतनशील' प्रश्न या संवादाने उभे केले आहेत. 'सदा' जेव्हा 'नाना'ला म्हणतो की, 'आरं असं काय बी केलं की हि लोक एैकत नाहीत. तुला येडयात काढतील. तुला भांडतील. नाही तर...तुला गोळया घालतील' तेव्हा सारं सभागृह आवक् होवून पाहात राहतं. वर्तमान काळात विवेकांवर होणारे हिंसक हल्ले अगदी मोजक्या शब्दात पण तितक्याचं ताकदीने संवादाच्या रूपाने मांडण्यात 'संवाद लेखक' यशस्वी झाला आहे. विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार आजची भाषा वापरून करावा लागेल याचा विचार करून संवाद लिहिताना कथेत नसलेले 'सदा' हे पात्र जोडण्यात आले आहे. प्रभावी संवाद, गरज तेथे गंभीरपणा, हजरजबाबी विनोद अशा आशयप्रधान संवाद लेखनामुळे 'संवाद लेखक' ऋतिक रास्ते याचं करावं तेवढं कौतुक कमीचं आहे. संवाद लेखना बरोबरचं त्याने स्वता: 'सदा'ची भूमिका अधिक प्रभावीपणे साकारली आहे. हे विशेष आहे. 
           आजच्या काळात अंधश्रध्देच्या अनेक घटना ऐकायला नि पाहायला मिळत आहेत. विवेकवादाचे बळी घेतले जात आहेत. धार्मिक लढाया लढल्या जात आहेत. सोशल माध्यमांचा एक वापर अंधश्रध्देच्या प्रसारासाठी वापरला जात आहे. तर दुसरीकडे दहशतवाद, सोशल मिडीया, शेतकरी, मोर्चा, आंदोलने, पर्यावरण या विषयांवर मोठया प्रमाणावर एकांकिका सादर केल्या जात आहेत. अशा कठीण काळात विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी निवडलेली 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका फारचं महत्वपूर्ण आहे. वर्तमान काळात त्याचीच आवश्यकता आहे. त्यामुळे हि एकांकिका सादर करणं तसं जिकीरीचं काम आहे. पण संघप्रमुख रोहित माने आणि त्याच्या टिमने ती हिंमत दाखवली. म्हणून त्याचं कौतुक करावंचं लागेलं.  वास्तववादी एकांकिकेला अस्सलता प्राप्त करून देण्यात दिग्दर्शक म्हणून रोहित माने यशस्वी झाला आहे. या टिममधल्या प्रत्येकाचं हे यश आहे. प्रत्येकाचं काम आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे. सटवू नाना—संतोष मोरे, केरू तात्या—ऋषिकेश पारखी, म्हादबा—आशुतोष मोहिते, भाऊ बाबाजी—अक्षय बहिरट, नाना—रोहित माने, सदा—ऋतिक रास्ते, शांतक्का—अपर्णा बहिरट, म्हातारी—श्वेता गायकवाड, घाबरट बाई—मिताली कळमकर, गावकरी—अक्षद पाईवाल, गावकरी—अजिंक्य मारटकर, डॉक्टर—रशीद शेख, हलगी वादक—अनिकेत राक्षे यांच्या सोबतचं प्रकाश योजना—अनुराग दुबळे आणि संगीत—रेणुका मदने अशा सगळयांची 'भूमिका' प्रयोगाच्या यशस्वीतेला कारणीभूत ठरली आहे. 
                  हे यश सगळया कलाकाराचं जसं आहे अगदी तसचं हि एकांकिका सादर करताना कशी करायची याची 'विना मोबदला' तब्बल 29 दिवस दिवस—रात्र राबणा—या अशिष टिळक नावाच्या आवलियाचं सुध्दा आहे. सोबतचं अशिषला मदत करणा—या हितेश दिवाडकर, राहुल झेंडे आणि हरहुन्नरी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे व इतर काही सहका—याचं ही योगदान नाकारता येत नाही.
               प्रयोग चांगला झाला नि आम्ही रात्री महाविदयालयात पोहचलो. सर्व कलाकार नि आम्ही म्हणजे हितेश, अशिष, संदीप, प्रशांत आणि राहूल होतो. कलाकारांनी प्रामाणिकपणे आपले अनुभव सांगितले. चुका मान्य केल्या. प्रत्यक्ष आत गेल्यावर काय वाटते. हे ही नमूद केले. उपस्थितांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. रात्री 11.35 ला आम्ही निघालो. पण माझ्या डोक्यात वारंवार 'सदा' नि 'नाना' हि पात्र येत होती. असे युवक गावोगावी व्हावेत असेही वाटत होते. 'सदा'ने सांगितले की, 'मी आयुष्यात पहिल्यादा मेकअप केला होता' बापरे किती मोठं स्पिरीट...हा विचार करत असतानाचं त्यानं दुसरं वाक्य फेकलं..'मी काही वेळ ब्ल्यान्ग झालो होतो' तेवढयात कुणी तरी सांगितलं 'आमची खाली भांडणं झाली होती', 'मी अपोआप थरथर कापत होतो', 'आमचं लाईटर बंद पडला होता', 'हयाने गाडग्याची दोरीचं जाळली होती त्यामुळे ते गाडगं धरल्यावर हात खूपचं गरम झाला होता', 'हा जातचं नव्हता मग मी हयाला जोरात लाथ मारली', 'हा हालगीचं वाजवत नव्हता', 'माझ्या टाळाचाचं आवाज जास्त येत होता', 'मी माझा डायलॉगचं विसरलो होतो', 'मरीआईच्या ठिकाणी मी मरीआळीचं बोलले', 'हे सगळेचं निघून गेले मग मी ही मरीआईचं दर्शन घेवून विंगेत पळाले' अशी वाक्य सतत आठवत राहिलो. कधी काळी आमचं ही असचं व्हायचं. आमचा उत्साह, आनंद, जोश, अनुभव, भांडणं याच प्रकारची असायची याची ही आठवण झाली...!! 
               .... तर मी सांगत होतो की, आम्ही घरी निघालो प्रशांत मला बोपोडी पर्यत सोबत होता. 'तो म्हणाला तुला काय वाटतंय? आपण टॉप नाईन ला असू का?' यावर मी प्रशांत प्रतिप्रश्न केला 'तुला काय वाटतंय? यावर तो विचारात पडला. पण मी माझं उत्तर देवून मोकळा झालो की, 'हे बघ प्रशांत संघप्रमुख या नात्याने मी किमान 160 एकांकिका बघितल्या आहेत. तर मला असं वाटतं की, यावेळी आपण 100 टक्के टॉप नाईनला असू. माझ्या उत्तरावर प्रशांत हसला नि पुढे निघून गेला. दुस—या दिवशी रोकडे सरांना हाच आत्मविश्वास 'फेसबुक'वर देवून बसलोय. कारण मी फार 'सकारात्मक' आहे. कदाचित प्रा.महादेव रोकडे सरांच्या 'डोन्ट वेरी बी पॉझिटिव्ह' या वाक्याचा माझ्यावर फारचं परिणाम महाविदयालयीन काळात झाला आहे. 
          कुणाला काहीही वाटत असो. सर्वानाचं मतं असतात. प्रत्येकाला थोडी फार तरी जाण असते. या न्यायाने मी या एकांकिकेकडे पाहातो आहे. त्यामुळे मला केवळ आत्मविश्वासचं नाही तर खात्री सुध्दा आहे की, या वर्षीच्या 'टॉप नाईन' आपली 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका असणार आहे. हे सारं लिहित असताना संदीप आठवलेंचं वाक्य ही आठवत आहे की, 'आँँफ पिरीयड'च्या वेळेस सुध्दा आपली अशीचं चर्चा झाली होती. पण आपण 11 व्या क्रमांकावर राहिलो होतो. 
        प्रयोगा नंतर प्रत्येक जण आपली मतं नोंदवित आहेत. कुणी चांगलं तर कुणी वाईट म्हणत आहे. बाहेरची ही मंडळी उत्साहाने प्रतिक्रिया नोंदवित आहेत. पण मी वेगळया दृष्टिने या एकांकिकेकडे पाहतो आहे. उपनगराच्या मुलांनी वर्तमानाला उत्तर देण्यासाठी असा विषय निवडणं. परिणामकारक मांडणं. टिमवर्क दाखविणं हे माझ्यासाठी फार मोलाचं आहे. खरं तर हि एकांकिका लिहिणारे, करणारे युवक—युवती पंचविशीच्या आतबाहेरचे आहेत. पण त्यांनी नाटय माध्यमाची प्रकट केलेली जाण आणि विषयाला भिडण्याची त्यांची सचोटी चकीत करणारी होती. या युवा कलाकरांनी आपापल्या व्यक्तिरेखांचे घेतलेले टायमिंग, साधलेला संवाद, वाचिक आणि शारिरीक अभिनयतून दाखविलेल्या छोटया—मोठया जागांना निश्चितचं सलाम करावा लागेल...!
            येत्या 28 तारखेला प्राथमिक फेरी संपणार आहे. आणि त्याचं दिवशी रात्री 9.30 ला 'टॉप नाईन' एकांकिकाचा निकाला 'संगणकाद्वारे प्रसिध्द होणार आहे. त्यामध्ये 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका असणार आहे. याची खात्री मला आहे. 'टॉप नाईन' मध्ये आल्यास आम्ही तुला 'खास पार्टी' देणार असे प्रा.महादेव रोकडे आणि प्रशांत दरोडे म्हणाले आहेत. तेव्हा त्या दोघांनी पार्टीची तयारी करावी असं त्यांना सांगावसं वाटतं आहे. म्हणून लागा तयारीला. शेवटी 'आव्वाज कुणाचा...टिजे कॉलेजचा'...!!

  सर्व कलाकारांना उद्देशून इतकचं की,

'रख हौसला वो मंजर भी आयेगा,
प्यासे के पास चलकर
समदर भी आयेगा।
थक कर न बैठ ये मंजिल के मुसाफिर
मंजिल भी मिलेगी
और मिलने का मजा भी आयेगा।।

 

©श्री.धनंजय मोहन झोंबाडे
   माजी विदयार्थी
  टि.ज.महाविदयालय.
  खडकी, पुणे.